सध्या परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातवरण तयार झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
8 ऑक्टोबरला मान्सून मुंबईतून निरोप घेणार
महाराष्ट्रात 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दुसरीकडे वायव्य राजस्थान आणि गुजरातमधील कच्छमधून मान्सून आधीच माघारी परतला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणासह दिल्लीतूनही मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं आता पावसाची शक्यता कमी आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळं सध्या राज्यात पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, आज हवामान विभागानं विदर्भ आणि मराठवाड्यात पावासाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अल्रट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तत्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.
राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा 23 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं शेती पिकांचे देखील नुकसान झालं आहे. ददरम्यान, राज्यात दमदार पाऊस झाल्यामुळं नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच धरणांच्या पाण्यासाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे.