नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. आयशर आणि टेम्पोमध्ये झालेल्या या भयंकर अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला तर 13 जण गंभीर जखमी झालेत.
हा अपघात इतका भयंकर होता की टेम्पोमधील मुलांच्या शरीरात लोखंडी सळ्या घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून आता या अपघाताचे एक महत्त्वाचे कारण समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रात्री आठ वाजता हा अपघात (Nashik Accident) घडला. अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वजण सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी होते. नाशिकमध्ये मुंबई- आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाण पुलावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आयशर ट्रक आणि टेम्पोमध्ये ही भयंकर अपघाताची घटना घडली.
नाशिकमधील सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील मुले टेम्पोमधून निफाड तालुक्यातील धारणगाव याठिकाणी देवाच्या कार्यक्रमाला गेले होते. देवाचा कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडली. रात्री आठच्या सुमारास हा टेम्पो द्वारका उड्डाण पुलावर पोहोचला. यावेळी त्यांच्यासमोर एक आयशर ट्रक निघाला होता.
('JD महाराष्ट्र NEWS' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
https://whatsapp.com/channel/0029Va5lRjKBA1f39O4RuC1g
या ट्रकमध्ये लोखंडी सळ्या भरल्या होत्या, मात्र वाहनाच्या शेवटी लाल रंगाचे कोणतेही निशाण, चिन्ह किंवा धोक्याचा इशारा देणारे चिन्ह लावले नव्हते. गाडीमध्ये अवजड सामान असताना टेललँम्प किंवा रेडियम लावणे बंधनकारक असते, मात्र असे कोणतेही नियम पाळण्यात आले नाहीत. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या टेम्पोला अंदाज आला नाही आणि गाडी पाठीमागून थेट ट्रकवर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की गाडीमधील सळ्या टेम्पोच्या काचा तोडून मुलांच्या शरीरामध्ये शिरल्या. त्यामुळे त्यांच्या शरिरातून प्रचंड रक्तस्त्राव झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झालेत.
तो शेवटचा स्टेटस अन् व्हिडिओ...
या अपघातात मृत्यू पडलेल्या आणि जखमी झालेल्या मुलांच्या ग्रुपचा एक स्टेटस आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. देवाच्या कार्यक्रमाला गेलेल्या या सर्वांनी ब्रदर्स असा कॅप्शन देत एक छान ग्रुप फोटो काढला होता तर गाडीमधून परत येताना त्यांनी ऑन गँग्स असं नाव देत एक व्हिडिओही काढला होता. त्या व्हिडिओमध्ये सर्व मुले अगदी आनंदात डान्स करताना दिसत आहेत.
मात्र हा फोटो अन् व्हिडिओ शेवटचा ठरेल असं त्यांच्या स्वप्नातंही आलं नसावं. तरुण मुलांचा असा भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाल्याने अवघा नाशिक जिल्हा हादरुन गेला आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातातील दोषींवर कारवाई करु असे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.